गाढ झोपेत होते… मध्यरात्रीच काळाचा घाला; बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, 22 जखमी

| Updated on: Apr 23, 2023 | 6:34 AM

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गाढ झोपेत होते... मध्यरात्रीच काळाचा घाला; बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, 22 जखमी
road accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : खासगी बसमधून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला पडला आहे. कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचं कळता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. मध्यरात्री सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांची भंबेरी उडाली. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला झाला. या अपघातात 22 जण जखमी झाले. तर 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

हे सुद्धा वाचा

केबिनचा चक्काचूर

ही खासगी ट्रॅव्हल बस कोल्हापूरहून डोंबिवलीला जात होती. नीता ट्रॅव्हल्सची ही बस होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात 22 प्रवाशी जखमी झाले. या सर्वांना ससून आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. तर या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी दिली.

पोलिसांची कसून चौकशी सुरू

दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधारप असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याशिवाय अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे याची ओळख पटवली जात आहे.