‘स्मार्ट सिटी’ पाण्यात का गेली? पुण्यातील हाहाकाराची कारणे काय? प्रश्नांचा पाऊस कायम
गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरात हाहाकार पहायला मिळाला. विविध ठिकाणी लोक अडकले, वाहने पाण्यात बुडाली, वाहतूक ठप्प झाली आणि पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं. यामागची नेमकी कारणं काय आहेत, याविषयीचा आढावा घेऊयात..

यंत्रणा सक्षम नसल्या की अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे सामान्य पुणेकरांनी गुरूवारी अनुभवलं. विकास प्रकल्प हे सर्वसामान्य माणसासाठी केले जात असल्याचा आव आणला जातो. पण निसर्गाला ओरबाडून त्याच्याच उरावर उभ्या राहत असलेल्या विकास प्रकल्पांमुळे सामान्य माणसाचं जगणं जिकिरीचं झालं आहे. बुधवारी पावसाने संततधार स्वरूपात हजेरी लावली होती. हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट असल्याने एवढ्या पावसाचा अंदाज नव्हता. त्यामुळे बुधवारी दुपारी खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला होता. पण जसजसा पावसाने दुपारनंतर जोर धरला, तसतशी नदीकाठच्या हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांच्या मनात धडकी भरू लागली. शहरातील सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, अतिक्रमणं, धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव, सांडपाणी वाहिन्यांची कामं पूर्ण केल्याचा पालिकेचा खोटा दावा, हवामान विभागाचे सतत चुकणारे इशारे यांमुळे गुरुवारी सर्वसामान्य पुणेकरांना ज्या परिस्थितींना सामोरं जावं लागलं, त्यांची उत्तरं मागायची तरी कुणाकडे? गुरुवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी सर्वसामान्य ‘स्मार्ट सिटी’करांच्या मनात प्रश्नांचा पाऊस कायम आहे. ...