पुणे : राज्यात मार्च महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट सुरु आहे. आता पुणे आयएमडीने १६ ते २० मार्चपर्यंतचा अंदाज वर्तवला आहे. सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संपामुळे पंचनामे होत नाही. या परिस्थितीत शेतकरी अडकले असताना पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करून हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 16, 2023
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे की, गेल्या २४ तासांत नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर आणि मुंबई ठाण्यासह राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात पाऊस
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने शेतकरी धास्तावला आहे. शेतात हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात असलेल्या ज्वारी पिकाला मोठा फटाका बसला असून या वातावरात बदलाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे.
नंदुरबारमध्ये मोठे नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली होती. त्यापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर गहूची पेरणी झाली होती.
तर त्या खालोखाल हरभरा, रब्बी ज्वारी आणि मका या पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात पहिल्यांदा सात मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला होता, तर आता १३ तारखेपासून सतत तीन दिवस वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संपामुळे पंचनाम्यानवर परिणाम झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, बुलढाणा ,चिखलीसह अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय.. त्यामुळे हाता – तोंडाशी आलेल्या गहू, हरबरा, मका वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडू लागली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे.