AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात राजकारण तापलं! समरजित घाटगे यांनी शेवटच्या प्रचारसभेत थेट हसन मुश्रीफांची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि…

"निवडणूक आता हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी राहिली नाही. जनतेने ही निवडणूक आता हाती घेतली आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे निष्ठा आहे. हे दाखवून द्यायची वेळ आली आहे. गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणारी ही निवडणूक होईल", असं समरजित घाटगे म्हणाले.

कोल्हापुरात राजकारण तापलं! समरजित घाटगे यांनी शेवटच्या प्रचारसभेत थेट हसन मुश्रीफांची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि...
समरजित घाटगे यांनी शेवटच्या प्रचारसभेत थेट हसन मुश्रीफांची ऑडिओ क्लिप ऐकवली
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 6:13 PM

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. राज्यभरात मोठमोठ्या नेत्यांच्या आज जाहीर प्रचारसभा पार पडल्या. राज्यभरात ठिकठिकाणी आज प्रचारसभांच्या रॅली निघाल्या. यानंतर आता प्रचार संपलाय. पण शेवटच्या प्रचारसभांमध्ये नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षांना चांगलेच फटकारे लगावले. कोल्हापूरच्या कागलमध्ये देखील अशा घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कागल विधानसभेचे उमेदवार समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कालच्या भाषणातील एक ऑडिओ क्लिप ऐकवत निशाणा साधला.

“मी शेवटची सभा कैदी चौकातच घेणार, असं म्हटल्यानंतर विरोधकांनी गरमी चौकच बुक करून टाकला. म्हणजे बघा आमचे विरोधक किती घाबरले आहेत. पण या निमित्ताने राम मंदिरासमोर सभा घ्यायची संधी मला मिळाली. आम्ही 300 रुपयांची हाजरी देऊन किंवा कर्नाटकातून एकही माणूस इथे आणलेला नाही”, असं म्हणत समरजित घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला.

‘गद्दारी करणाऱ्यांना त्यांची…’

“निवडणूक आता हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी राहिली नाही. जनतेने ही निवडणूक आता हाती घेतली आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे निष्ठा आहे. हे दाखवून द्यायची वेळ आली आहे. गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणारी ही निवडणूक होईल. 25 वर्षात 7 हजार कोटींची कामे केली, असं मुश्रीफ सांगत आहेत. दुर्दैवाने येथे आजही कोणतेही मोठी शैक्षणिक संस्था नाही किंवा मोठा दवाखाना नाही. कागल एमआयडीसीमध्ये बारा वर्षात एकही मल्टिनॅशनल कंपनी आली नाही हा या मंत्रिमहोदयांचा रेकॉर्ड आहे”, अशी टीका समरजित घाटगे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

‘या सगळ्या खंडणीखोरांचा धंदा बंद पडल्याशिवाय…’

“याचं कारण म्हणजे कंपन्यांना दिला जाणारा त्रास आहे. आपला आशीर्वाद मिळाला तर या सगळ्या खंडणीखोरांचा धंदा बंद पडल्याशिवाय राहणार नाही. कागलमधील 14-15 वर्षाची मुलं गांजाच्या आहारी जात आहेत. इतकी दुर्दैवी परिस्थिती या शहराची आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या हसनमुक्ती, त्यांनी सांगावं त्यांनी या आमदारकीच्या काळात किती गंगाराम कांबळे तयार केले. प्रचारासाठी त्यांना भाड्याने वासुदेव आणावे लागले. काही ठिकाणी लिंबू मिरची टाकली गेली आणि तर एका गावात माझ्यावर भानामतीचा प्रकार झाला. स्वत:ला पुरोगामी म्हणणाऱ्या हसन मुश्रीफांना असले प्रकार शोभत नाहीत”, असा घणाघात समरजित घाटगे यांनी केला.

ऑडिओ क्लिप ऐकवत समरजित घाटगे यांची खोचक टीका

यावेळी समरजित घाटगे यांनी काल कैदी चौकात हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा ऑडिओ ऐकवली. या क्लिपमध्ये हसन मुश्रीफ म्हणत आहेत, “खर्डेकर चौकात सभा घेणे अशुभ आहे. आता मला जयंत पाटील यांची काळजी लागली आहे. या निवडणुकीत कदाचित त्यांचाच करेक्ट कार्यक्रम झाला नाही म्हणजे बरं झालं.” या क्लिपवर समरजित घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली. “खर्डेकर चौकात राम मंदिर आहे आणि हा चौक अशुभ आहे असं तुम्ही म्हणता? त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. या पंधरा दिवसात या मतदारसंघात पैशाचा भरपूर वापर होत आहे. आता कदाचित हसन मुश्रीफच पाकीट घेऊन प्रत्येकाच्या घरात जातात की काय? असं वाटू लागलं आहे”, अशी खोचक टीका समरजित घाटगे यांनी केली.

“मागील पाच वर्ष मी कागल गडहिंग्लज उत्तरच्या परिवर्तनासाठी झटतोय. हे परिवर्तनाचं काम करण्यासाठी आतापर्यंत मी जबाबदारी घेतली. आता ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय. शक्तिपीठ महामार्गावर खोटा जीआर इथल्या पालकमंत्र्यांनी काढला आहे. माझी जयंत पाटील यांना विनंती आहे, सत्तेवर आल्यानंतर तुम्ही खरा जीआर काढून दाखवा. आजच घोषित करतो की आदरणीय पालकमंत्र्यांची सत्ता आता गेली आहे. संविधानिक पद्धतीने ती सत्ता आणायचा प्रयत्न दीड दिवसात करतील. मात्र त्याला प्रतिसाद देऊ नका”, असं आवाहन समरजित घाटगे यांनी केलं.