रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजेंच पत्र, इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे म्हणतात…
"औरंगजेब हा क्रूर होता. तो 27 वर्ष महाराष्ट्रात राहीला. मराठ्यांनी त्याला या मातीत गाडला हे प्रतिक आहे. त्यामुळ औरंगजेबाची कबर रहावी" असं इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलं आहे.

माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. “वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही” त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. या कुत्र्याची समाधी म्हणजे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असल्याच त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
“वाघ्या कुत्र्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबध नाही. त्यामुळे तो पुतळा हटवला पाहिजे. हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा पेशवेकालीन आहे त्यामुळे याला अनेक संदर्भ आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
‘औरंगजेबाची कबर रहावी’
“रायगडावरती वाघ्या कुत्र्याचा कोणताही पुरावा नाही. राम गणेश गडकरींच्या डोक्यात कल्पनाविलास आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत, त्याचा हा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान आहे. त्यामुळे ही समाधी हटवावी. संभाजीराजेंनी जे पत्र दिलं आहे, ते एकदा विषय घेतला की तडीस नेतात. राज्य सरकारला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल. वाघ्या कुत्रा हा कोणत्याही समकालीन संदर्भात नाही. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच प्रतीक आहे. औरंगजेब हा क्रूर होता. तो 27 वर्ष महाराष्ट्रात राहीला. मात्र मराठ्यांनी त्याला या मातीत गाडला हे प्रतिक आहे. त्यामुळ औरंगजेबाची कबर रहावी” असं इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय बोलले?
“मला एक कळत नाही, महाराज 1680 ला गेले. आता हा सगळा काळ इतके वर्ष झाले आता 2025 सुरु आहे. का असे जुने मुद्दे काढले जातात? ही समाधी आज आहे का? चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश तिथे नेलेला. पंतप्रधान, राष्ट्रपती तिथं येऊन गेले, मुद्दा मांडायचा अधिकार सगळ्यांना आहे. आपल्यासमोर अनेक आव्हान, मुद्दे आहेत. AI एक मोठं आव्हान आहे, शेतीचे प्रश्न आहेत, या गोष्टीला आपण महत्व देतोय. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं हे पण आहे. कालानुरूप बदलावं लागतं. मधून-मधून कुणी नवे वक्तव्य करतात आणि तेवढ्यापुरती चर्चा सुरू होते या पेक्षा रोजगार उद्योगांवर बोला” असं अजित पवार म्हणाले.