explainer : पाकिस्तानने शिमला करार रद्द का केला? पाकच्या खेळीमागे चीनचा डाव?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्ताननं शिमला करार रद्द केला आहे. यामागे चीनचा डाव असल्याचं बोललं जातं आहे.

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं देखील थयथयाट करत काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्ताननं शिमला करार रद्द केला आहे. मात्र पाकच्या या निर्णयामागे चीनचा डाव असू शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, या संदर्भात संरक्षण क्षेत्रातील विश्लेषक सतीश ढगे यांनी माहिती दिली आहे.
चीनने पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. त्यामुळे जर पाकिस्तानचं भारतासोबत युद्ध झालं तर चीन सामारिक दृष्या पाकिस्तानला मदत करू शकतो. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पूर्वेकडून आणि उत्तरेकडून भारतावर कुरघोडी करण्याची संधी आयतीच चीनला मिळणार आहे, आणि हेच सगळं गणित लक्षात घेऊन आता चायना आणि पाकिस्तान एकत्रितरित्या भारताविरुद्ध रणनीती आखू शकतात, याचाच एक भाग म्हणून शिमला कराराला एक प्रकारे रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानने त्या ठिकाणी घेतला असावा असं ढगे यांनी म्हटलं आहे.
शिमला कराराच्या एका क्लॉज अनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जे मुद्दे आहेत ते केवळ चर्चेच्या माध्यमातून आणि शांततेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी सोडवावेत, यामध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाची किंवा पक्षाची मध्यस्थी असू नये, असं म्हटलं होतं. मात्र आता पाकिस्तानने हा करार रद्द केल्यास चायनाला आयती संधी मिळणार आहे. पश्चिमेकडून पाकिस्तान तर पूर्वेकडून आणि उत्तरेकडून चीन भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू शकतात, आणि त्यातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, हे सर्व गणित लक्षात घेऊनच पाकिस्तानने शिमला कराराला स्थगिती दिली आहे. यामुळे या प्रकरणात आता चायनाला एण्ट्री करणं सोपं होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कोणी सहभागी होते, ते आणि त्यांचे आका यांना आम्ही शोधून काढू, ते जगाच्या कुठल्याही कोपर्यात लपून बसले असले तरी सुद्धा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, सोबतच जे घरभेदी ऑन ग्राउंड वर्कर्स आहेत त्यांचा देखील शोध घेतला जाईल, सीमेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्मीर असो किंवा पाकिस्तानमध्ये लपून बसलेले विविध दहशतवादी संघटनेचे आका असोत, त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या इशाऱ्यानंतर आता ऑन ग्राउंड वर्कर्सविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे.दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात येत आहेत. या दहशतवाद्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली आहेत, याचाच अर्थ फक्त पहलगामच नाही तर भविष्यात देखील काश्मीर अशांत ठेवण्याचा त्यांचा कट असल्याचं दिसून आलं आहे.
