AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack: ‘आम्ही कुठे मरतोय…’, भारताविरोधात पाकिस्तानी क्रिकेटनं कालवलं विष

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारतीय क्रिकेटपटूंनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सौरव गांगुली यांनी या घटनेवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. पण पाकिस्तानी क्रिकेटपटूने याबद्दल गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे.

Pahalgam Terror Attack: 'आम्ही कुठे मरतोय...', भारताविरोधात पाकिस्तानी क्रिकेटनं कालवलं विष
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Apr 27, 2025 | 10:51 AM

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. फिरायला गेलेल्या भारतीयांनी स्वतःचे प्राण गमावल्यामुळे देशात सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. घडलेल्या घटनेवर प्रत्येक भारतीय तिव्र निषेध व्यक्त करत आहे. सेलिब्रिटींपासून क्रिकेटर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. हल्ल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे… असं वक्तव्य भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधान सौरव गांगुली यांनी केलं.

हल्ल्यानंतर भारताने दोषींवर कठोर कारवाई केलीच पाहिजे. हा आता एक विनोद झाला आहे. दरवर्षी अशा घटना घडत आहेत. दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही. भारताने पाकिस्तानशी क्रिकेटमधील सर्व संबंध तोडले पाहिजेत. कोणत्याही आयसीसी किंवा आशियाई स्पर्धेतही त्यांच्यासोबत खेळू नये… अशी भूमिका सौरव गांगुली यांनी मांडली. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने भारताविरुद्ध विधान केलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहलगाम हल्ल्यावरून त्याने गांगुली यांच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तन्वीर अहमदने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत कोणतेही विधान केले नाही. एवढंच नाही तर, त्याने या घटनेबद्दल दुःख देखील व्यक्त केलं नाही. पण सौरव गांगुलीने पाकिस्तानसोबत न खेळण्याचे आवाहन करताच तन्वीरला धक्का बसला.

तन्वीर म्हणाला, ‘सौरव गांगुली सरांना सन्मानाने सांगतो की, भारतीय संघ फक्त आयसीसी सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळतो. त्याशिवाय तुम्ही आमच्यासोबत कोणत्या मालिका खेळता? आणि आयसीसी देखील खेळला नाहीत… आम्ही कुठे तुमच्यासोबत खेळायला मरत आहोत…’

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा तन्वीर याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याआधी देखील अनेकदा त्याने भारताविरोधात विष कालवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा आयपीएल, तो भारताच्या प्रत्येक यशात काहीतरी दोष शोधत राहतो. नुकताच तन्वीरने आयपीएलवर प्रश्न उपस्थित केले.

एवढंच नाही तर, आयपीएल सुरु झाल्यानंतर तन्वीर याने अनेकदा विराट कोहली याच्यावर निशाणा साधत आहे. यासोबतच तन्वीर, बाबर आझम त्याच्यापेक्षा मोठा असल्याचं म्हणत आहे. यापूर्वी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या… असं वक्तव्य देखील केलं होतं.

22 एप्रिल रोजी झालेला हल्ला…

22 एप्रिल रोजी पुन्हा एकदा भारतीय भूमीवर दहशतवादाचा कहर दिसून आला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी नि:शस्त्र आणि निष्पाप पर्यटकांवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये २६ लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले.