पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाच्या कणालाही शिवणार नाही
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान धारणेला बसले आहेत. आज संध्याकाळी तामिळनाडूत आल्यावर त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये मोदींनी ध्यान धारणेला सुरुवात केली आहे. मोदी हे 45 तास ध्यान साधना करणार आहेत.
![पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाच्या कणालाही शिवणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाच्या कणालाही शिवणार नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/PM-Narendra-Modi-11.jpg?w=1280)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी आज संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. 45 तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या 45 तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत. ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान साधना आज संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुरु झाली. ते 45 तास ध्यानधारणा करतील. या 45 तासात ते फक्त नारळ पानी, द्राक्षाचा रस आणि इतर तरल पदार्थ घेतील. या काळात ते ध्यान कक्षातून बाहेर येणार नाहीत. ते 45 तास मौन पाळणार आहेत.
1 जूनला ध्यान साधना संपणार
पंतप्रधान मोदी आज तामिळनाडूत आले. तामिळनाडूत आल्यावर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात पूजा केली. त्यानंतर ते विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये आले. याच ठिकाणी त्यांनी ध्यान धारणा सुरू केली असून जवळपास दोन दिवस ते ध्यानमग्न अवस्थेत राहणार आहेत. 1 जूनला ते ध्यान साधनेतून बाहेर येतील. इथून निघण्यापूर्वी ते संत तिरुवल्लूवर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतील. तिरुवल्लूवर यांचं स्मारक आणि मूर्त्या या दोन्ही छोट्या बेटांवर उभारण्यात आल्या आहेत.
दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त
विवेकानंद रॉक मेमोरिअल समुद्रात आहे. मोदी 45 तास या बेटावर थांबणार असल्याने या ठिकाणी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी 2000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच भारतीय तट रक्षक दल आणि नौदलाचे जवानही तैनात राहणार आहेत. मोदींच्या ध्यान साधनेची माहिती यापूर्वीच भाजप नेत्यांनी दिली होती. 2019च्या निवडणुकीवेळी मोदी केदारनाथ गुहेत ध्यान साधनेला बसले होते.
1 तारखेला शेवटचा टप्पा
दरम्यान, देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. येत्या 1 तारखेला लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपत आहे. त्यानंतर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुन्हा देशात भाजपची सत्ता येणार की काँग्रेसला संधी मिळणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.