इंडिया आघाडीच्या बैठकीला बोलावले नाही तर…, एनडीएत जाण्याच्या चर्चांवर काय म्हणाले बेनिवाल
हनुमान बेनिवाल यांना इंडिया आघाडीच्या बैठकीला न बोलवल्याने ते नाराज आहेत. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर संताप व्यक्त केलाय. माझ्या पक्षामुळेच काँग्रेसला जागा मिळाल्या आहेत, असे हनुमान बेनिवाल म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीए आघाडी सरकार स्थापन करणार आहे. सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता ९ जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे. आज दिल्लीत त्यासाठी बैठका सुरु होत्या. एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत होते. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या ही बैठका सुरु आहेत. दरम्यान इंडिया आघाडीचा भाग असलेल्या राजस्थानच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख हनुमान बेनिवाल यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे बेनिवाल यांनी म्हटले आहे. यासोबतच बेनिवाल यांनी आपली भविष्याची रणनीतीही स्पष्ट केली आहे. RLP पक्षाचे प्रमुख हनुमान बेनिवाल म्हणाले की, “मला इंडिया अलायन्सच्या बैठकीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. इंडिया आघाडीने बैठकीचे निमंत्रित दिले नाही तरी मी केले एनडीएसोबत जाणार नाही.” इंडिया आघाडीच्या बैठकीचं आमंत्रण न मिळाल्याने ते एनडीएमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
हनुमान बेनीवाल म्हणाले की, त्यांचा मुख्य मुद्दा अग्निवीर योजना संपवणे हा आहे. बेनिवाल यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक एनडीए आघाडीसोबत लढवली होती. मात्र यंदा त्यांनी इंडिया आघाडीसह निवडणूक लढवली आहे. राजस्थानच्या नागौर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.
नागौरमधून विजयी झालेले हनुमान बेनिवाल यांची एक कथि़त ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते काँग्रेस विरोधात बोलताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीला न बोलवल्याने ते प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. बाडमेरमध्ये काँग्रेस पक्ष फोडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मतदानानंतर दोन बैठका घेतल्या पण मला निमंत्रण दिले नाही याचे मला दु:ख झाले आहे. तर दक्षिणेतील एकल सदस्य पक्षाला बोलावण्यात आले असे ते म्हणताय.
हनुमान बेनिवाल पुढे म्हणाले की, हा माझा पूर्ण अपमान आहे. जिथे बाडमेर आणि शेखावती या जाट गटाच्या दोन नेत्यांना मी युतीत सामील व्हावे असे वाटत नव्हते. एकीकडे त्यांनी युती केली. दुसरीकडे माझा पक्ष तुटला.