pm narendra modi speech timing today : करारा जवाब मिलेगा… ; पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता लोकसभेत बोलणार?
लोकसभेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोदी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
![pm narendra modi speech timing today : करारा जवाब मिलेगा... ; पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता लोकसभेत बोलणार? pm narendra modi speech timing today : करारा जवाब मिलेगा... ; पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता लोकसभेत बोलणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/10183616/pm-narendra-modi-52.jpg?w=1280)
नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : केंद्रातील भाजप सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज चर्चेचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदानाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मोदी आज विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता लोकसभेत भाषण करणार आहे. अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मोदी समाचार घेतील. याच भाषणात ते मणिपूरची हिंसा, त्याची कारणे, सरकारने केलेले प्रयत्न आणि सध्याची परिस्थिती यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच मणिपूरमध्ये आतापर्यंत किती नुकसान झालं? किती लोकांचा मृत्यू झाला? किती घरेदारे जाळली गेली आणि किती लोक जखमी झाले याची माहितीही मोदींकडून दिली जाण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या भाषणानंतर लगेचच अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. यावेळी आवाजी मतदान होणार आहे.
विरोधकांचे आरोप काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये का गेले नाही?
मणिपूर हिंसेवर बोलण्यासाठी मोदींना 80 दिवस का लागले?
केवळ 30 सेकंदाचं भाष्य केलं. या 30 सेकंदात मोदी महिलांच्या नग्न धिंड निघाल्याच्या व्हिडीओवर बोलले, मणिपूरमधील हिंसेवर का बोलेल नाही?
मोदींनी मणिपूरमधील लोकांबाबत सहानुभूती का दाखवली नाही? त्यांनी मणिपूरमध्ये शांतता राखण्याचं आवाहन का केलं नाही?
दोन महिन्यांपासून हिंसा सुरू आहे, मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी का केली नाही? राज्यात मोठा हिंसाचार घडल्याचं मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे, असं असताना मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही?
या नेत्यांनी केलं भाषण
गेल्या दोन दिवसात संसदेत अविश्वास ठरावावर काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई, सपाच्या खासदार डिंपल यादव, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, टीएमसी खासदार सौगत रॉय, डीएमके खासदार टीआर बालू, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस खासदार मनिष तिवारी, जेडीयू खासदार राजीव रंजन सिंह, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाषण केलं. तर सत्ताधारी पक्षाकडून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री नारायण राणे, स्मृती ईराणी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केलं होतं.
लोकसभेत बहुमत कितीला?
लोकसभेच्या एकूण 538 जागा आहे. 270 ला बहुमत आहे. मात्र, भाजपकडे 301 जागा आहे. बहुमतापेक्षाही भाजपच्या खासदारांचा आकडा अधिक आहे.
सत्ताधारी पक्षाचं बलाबल
भाजप- 301 शिवसेना (शिंदे गट) – 12 लोजपा – 6 अपना दल (एस) – 2 राष्ट्रवादी (अजित गट) – 1 आजसू – 1 एआयएडीएमके – 1 मिजो नॅशनल फ्रंट – 1 नागा पीपुल्स फ्रंट – 1 नॅशनल पीपुल्स पार्टी – 1 नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी – 1 सिक्किम क्रांतिकारी मोर्चा -1 अपक्ष – 2 एकूण – 331
विरोधकांचं पक्षीय बलाबल
काँग्रेस – 50 डीएमके – 24 टीएमसी – 23 जेडीयू – 16 सीपीएम – 3 इंडियन यूनियन मुस्लिम लीग – 3 नॅशनल कॉन्फ्रेंस – 3 सपा – 3 सीपीआय – 2 आम आदमी पार्टी – 1 जेएमएम – 1 केरल काँग्रेस – 1 आरएसपी (रेवॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी) – 1 वीसीके – 1 शिवसेना (उद्धव गट) – 7 एनसीपी (पवार गट) – 4 अपक्ष – 1 एकूण – 144
तटस्थ पक्षांचं बलाबल
वायएसआर – 22 बीजेडी -12 बीएसपी – 9 टीडीपी – 3 अकाली दल – 2 एआययूडीएफ – 1 जेडीएस – 1 आरलएपी – 1 अकाली दल (सिमरजीत सिंग मान) – 1 एआयएमआयएम – 2 टीआरएस – 9 एकूण – 63