Marathi News Politics Aurangabad BJP Jal Akrosh Morcha Devendra Fadnavis warns ShivSena in BJP Protest in Aurangabad Fadnavis remembers Gopinath Munde
Devendra Fadnavis : सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता व्यवस्था बदलायची आहे, फडणवीसांचा शिवसेनेला थेट इशारा, गोपीनाथ मुंडेंचीही आठवण
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. 'आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे', असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाImage Credit source: TV9
औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या मोर्चात उंटांवर, ऑटो रिक्षावरही रिकाम्या घाबरी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. ‘आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे’, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय. तसंच भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आठवणही फडणवीस यांनी यावेळी काढली.
‘भावनेचं राजकारण केलं, पण थेंबभर पाणी ते देऊ शकले नाहीत’
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा संभाजीनगरच्या जनतेचा आक्रोश आहे. या सरकारनं आणि महापालिकेतील शिवसेनेनं जनतेला केवळ आश्वासनं दिली. भावनेचं राजकारण केलं, पण थेंबभर पाणी ते देऊ शकले नाहीत. आमच्या सरकारच्या काळात जी सोळाशे कोटीची योजना आम्ही मंजूर केली, त्याही योजनेत 600 कोटी महापालिकेला मागितले. अर्धा किमीचं कामंही करु शकले नाहीत. त्यामुळे हा मोर्चा नाही तर संभाजीनगरच्या जनतेचा आक्रोश आहे. याचा सामना सरकारला करावाच लागेल. संभाजीनगरला पाणी मिळाल्याशिवाय आमचा संघर्ष संपणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी शिवसेनेला दिलाय.
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला आणि सत्ता बदल केला होता
दरम्यान, भाजपचा मोर्चा म्हणजे नौटंकी असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आलीय. त्याबाबत विचारलां असता फडणवीसांनी जोरदार पलटवार केला. ‘ज्यांनी जीवनात काहीच केलं नाही, केवळ भावनेचं राजकारण केलं, लोकांना मुर्ख बनवलं त्यांना ही नौटंकीच वाटणार. त्यांनी कधी जनतेसाठी संघर्ष केलाच नाही, ते तिथे बसून करत आहेत ती खरी नौटंकी आहे’, असं फडणवीस म्हणाले. तसंच आम्ही मागच्या काळात याच मार्गाने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला आणि सत्ता बदल केला होता. आता सत्ताबदल नाही तर व्यवस्था बदलासाठी मोर्चा आहे. सत्ताबदल करायचा तेव्हा करूच, पण आज व्यवस्था बदलायची आहे. भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलून सामान्य माणसाला पाणी द्यायचं आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.