दोस्तीत कुस्ती बरी नाही, धैर्यशील मानेंची रोखठोक प्रतिक्रिया, बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची चाहूल
महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द आणि निवडणुकीनंतर झालेली परिस्थिती यामुळे सर्वात मित्रपक्ष असलेली शिवसेना भाजपपासून दूर झाली. आता बिहारमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय, असं चित्र असल्याचं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ बनला आहे. त्यामुळे आता भाजपकडून नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनीही त्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (Shivsena MP dhairyashil mane on Bihar election)
महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द आणि निवडणुकीनंतर झालेली परिस्थिती यामुळे सर्वात मित्रपक्ष असलेली शिवसेना भाजपपासून दूर झाली. आता बिहारमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय, असं चित्र असल्याचं धैर्यशील माने म्हणाले. ‘दोस्तीत कुस्ती बरी नाही’ या म्हणीचा वापर करत राजकारणात जागा कमी किंवा जास्त झाल्या म्हणून शब्द न पाळणं, हे बरोबर नसल्याचं सांगत माने यांनी भाजपला टोला लगावलाय. बिहारमध्ये चिराग पासवान यांनी नितीश कुमारांसमोर स्वत:ची माणसं उभी केली. त्यामुळे नितीश कुमार यांना नुकसान झालं. हे कुणापासून लपलेलं नाही, अशी टीकाही माने यांनी भाजपवर केली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मिळून काम करत आहे. विरोधी बाकांवर असलेल्या भाजपनं जे काही करावं ते महाराष्ट्राचा विचार करुन करावं. कारण शेवटी राज्याचं हित महत्वाचं, असा सल्लाही धैर्यशील माने यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध : रोहित पवार
भाजप मित्रपक्षांना संपवतोय याच उत्तम उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळाले. संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांचा घात झाला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ‘भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल’, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले @yadavtejashwi हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2020
“स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन”
बिहारमध्ये शिवसेनेनं लढवलेल्या 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. निलेश राणे यांनी काही मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी ट्वीट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी असं लिहीत, ‘वारंवार देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’ अशी उपरोधिक टीका निलेश राणे यांनी केली आहे.
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी.
बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145
राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310
गया: शिवसेना-21 मते, नोटा-79.
मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222
नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
संबंधित बातम्या:
Bihar election result 2020: बिहारमध्ये सत्ता NDAचीच, पण नितीश कुमारांना मोठा झटका, तेजस्वी तळपले!
बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार: किरीट सोमय्या
Shivsena MP dhairyashil mane on Bihar election and Maharashtra BJP