Borivali VidhanSabha : बोरिवलीत भाजपा वेगळी चाल खेळण्याच्या तयारीत, विद्यमान आमदाराचं तिकीट कापणार का?
Borivali VidhanSabha : बोरिवली हा उपनगरात येणारा विधानसभा मतदारसंघ. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग. बोरिवली भाजपाचा बालेकिल्ला. त्यामुळे भाजपाने या विधानसभा मतदारसंघातून नेहमीच प्रयोग केले. नवीन उमेदवाराला संधी दिली. पण यावेळी बोरिवलीमध्ये भाजपा वेगळी चाल खेळण्याच्या तयारीत आहे.
बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाप्रमाणे बोरिवली विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी सुरक्षित मानला जातो. बोरिवलीमध्ये मराठी आणि गुजराती मतदारांची भूमिका निर्णायक आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघ मागच्या 20 वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. भाजपाने मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत दोन वेगवेगळ्या उमेदवारांना संधी दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दोनवेळचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून त्यांच्याजागी पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. पियुष गोयल यांनी अगदी आरामात लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपाने अशाच दोन वेगवेगळ्या उमेदवारांना उमेदवारी दिली. त्यावेळी सुद्धा यश मिळालं.
यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं. त्यावेळी ते नाराज झाल्याची चर्चा होती. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांच्याशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने सुनील राणे आमदार आहेत. 2019 मध्ये सुनील राणे यांना तब्बल 123,712 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर 95,021 च्या मताधिक्क्याने मात केली होती. त्यांच्याआधी भाजपाने सुरक्षित मतदारसंघ म्हणून विनोद तावडे यांना संधी दिली. विनोद तावेड यांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यांनी सुद्धा मोठ्या फरकाने विजय मिळवलेला. तावडेंच्या आधी गोपाळ शेट्टी इथून आमदार होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राम नाईक यांच्याजागी गोपाळ शेट्टींना संधी दिली. दोन्हीवेळा शेट्टी मोठ्या मताधिक्क्याने निवडून लोकसभेवर गेले.
बोरिवलीत उमेदवारी कोणाला?
आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. याचा अर्थ सुनील राणे यांचा पत्ता कट होणार. विधानसभेला पुन्हा संधी देऊन गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कारण प्रस्थापित सरकार विरोधी लाट असताना गोपाळ शेट्टी यांची नाराजी भाजपाला परवडणारी नाही. गोपाळ शेट्टी यांचा बोरिवली विधानसभा मतदारसंघात तगडा जनसंर्पक आहे. गोपाळ शेट्टी मविआकडे वळले तर फटका बसू शकतो. त्यामुळे सद्य स्थितीत हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याची भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पुन्हा एकदा गोपाळ शेट्टींना संधी मिळण्याची शक्यता आहे.