शरद पवार यांचं टेन्शन ‘त्या’ घटनेमुळे दूर झालं; संघ सदस्याचा मोठा दावा

| Updated on: Jun 13, 2024 | 2:21 PM

26/11च्या हल्ल्यात संघाचा हात होता, असं एका पुस्तकात म्हटलं. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला कृपाशंकर सिंह गेले होते. तेही भाजपमध्ये आले, त्यांनीही माफी मागितली नाही. आरके सिंह हेही आले. ते चांगले अधिकारी होते. त्यांच्या कामाबद्दल शंका नाही. पण त्यांनी आरएसएस दहशतवादी संघटना आहे, असं म्हटलं होतं. यूपीच्या सरकारमध्ये मी होतो. त्यामुळे मला तसं बोलावं लागलं. सरकारच्या सूचना असतात असं त्यांनी सांगायला हवं होतं, असं संघाचे सदस्य रतन शारदा म्हणाले.

शरद पवार यांचं टेन्शन त्या घटनेमुळे दूर झालं; संघ सदस्याचा मोठा दावा
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हल्यू कमी झाली, असं सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य रतन शारदा यांनी खळबळ उडवून दिली होती. रतन शारदा यांनी संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मध्ये लेख लिहून हा दावा केला होता. त्यावर काल दिवसभरात चांगल्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रतिक्रिया सुरू असतानाच रतन शारदा यांनी पुन्हा एकदा एक मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने शरद पवार यांचं टेन्शन दूर झाल्याचं रतन शारदा यांचं म्हणणं आहे. रतन शारदा यांच्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

रतन शारदा यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. शरद पवार हे मुलगी आणि पुतण्यातील अंतर्गत वादामुळे त्रस्त झाले होते. पण अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांचं टेन्शन दूर झालं, असं रतन शारदा यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या निवडणुकीतील कामगिरीचं विश्लेषणही केलं आहे. 70 वर्ष ज्या संघटनेने कधीही एकत्र काम केलं नाही. समाजवादी विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा नेहमी हिंदुत्ववादी विचाराच्या विरोधात राहिली आहे. त्यांनी नेहमीच हिंदुत्वावादी विचारधारेला विरोध केला. सार्वजनिक ठिकाणी आणि कुठेही संघाला स्थान दिलं जात नव्हतं. अशावेळी भाजप नंबर वन झाल्यावर भाजपचे लोक राष्ट्रवादीला मतदान करतील का? जनसंघ आणि भाजपच्या विरोधात हे लोक होते. त्यांना भाजपचं मतदान ट्रान्स्फर होईल का? असा सवाल करतानाच या निवडणुकीत भाजपचं मतदान ट्रान्फर झालं नाही, असं रतन शारदा म्हणाले.

मुस्लिम मतांवर जिंकले

उद्धव ठाकरे हे मुस्लिमांच्या मताने जिंकले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी कायम मुस्लिमांना विरोध केला. 1992ची घटना कोणी विसरले नाही. तरीही ठाकरेंना मुस्लिमांची मते मिळाली. केवळ मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं. बाकी सर्व मते विभागली गेली. तुम्ही आकडे पाहा, असं रतन शारदा यांनी स्पष्ट केलं.

सर्व मतदार संभ्रमात होते

एकीकडे घड्याळ, पंजा, धनुष्यबाण आणि भाजप. दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना ही विचित्र परिस्थिती होती. मतदान करताना लोक संभ्रमात होते. तुमची लॉयलटी कार्यकर्त्यांशी आहे. तुम्हीच गोंधळ निर्माण केला. या निवडणुकीत फक्त मुस्लिम वोट कन्फर्म होती. बाकी सर्व मतदार संभ्रमात होते. हे वातावरण दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा तयार केला पाहिजे. हा नेता तिकडे गेला, तो नेता इकडे आला हे करून चालणार नाही. कोणत्याच नेत्याने या निवडणुकीत विकासाचा ब्ल्यू प्रिंट दिला नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी माफी मागायला हवी

लोकांना विचारधारा बदलण्याचा अधिकार आहे. तुम्ही राजकारणी असाल आणि तुम्हाला आज भाजप काम करत नाही असं वाटलं तर तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ शकता. काँग्रेसवाल्यांना वाटलं की इथे हिंदूंना न्याय मिळत नाही. आपलं भवितव्य नाही तर ते भाजपमधील जातील. पण जे पक्षांतर करतील त्यांनी येताना माफी मागितली पाहिजे. माझ्याकडून चूक झाली असं त्यांनी सांगितलं पाहिजे. आता मी या पक्षासोबत आहे, असं सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.