फायनल सामना जिंकताच रोहित शर्मा रचणार इतिहास, जगातील कोणताच कॅप्टन हे करु शकला नाही
भारतीय संघासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. कारण भारतीय संघ आज टी२० वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणार आहे. टी२० च्या इतिहासात रोहित शर्माकडे आणखी विक्रम करण्याची संधी आहे.
![फायनल सामना जिंकताच रोहित शर्मा रचणार इतिहास, जगातील कोणताच कॅप्टन हे करु शकला नाही फायनल सामना जिंकताच रोहित शर्मा रचणार इतिहास, जगातील कोणताच कॅप्टन हे करु शकला नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/rohit-sharma-1-4.jpg?w=1280)
बार्बाडोस : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हलवर होणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना हारलेले नाहीत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. त्यांच्या नेतृत्वात टी२० वर्ल्डकप जिंकून देण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. रोहित गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव विसरून टी-२० ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. रोहितची बॅट सध्याच्या स्पर्धेत चांगली चालत आहे. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. हिटमॅनने 7 सामन्यात 41.33 च्या सरासरीने 248 धावा केल्या आहेत.
या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित हा रहमानुल्ला गुरबाजपेक्षा केवळ 33 धावांनी मागे आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याची चांगली संधी असेल. याशिवाय रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी एक मोठा विक्रम करू शकतो.
50 T20I सामने जिंकणारा पहिला कर्णधार
2021 मध्ये रोहित शर्माला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 61 T20 सामन्यांमध्ये त्याने भारताचे नेतृत्व केले. यापैकी त्याने 49 सामने जिंकले आहेत. त्याची विजयाची टक्केवारी 78.68 आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केल्यामुळे त्यांचा शेवटचा विजय मोठा होता. इंग्लंडला हरवून रोहित सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. मात्र, रोहितकडे आणखी एक मोठा विक्रम करण्याची चांगली संधी आहे. जर भारताने आज फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यामुळे T20I मध्ये 50 सामने जिंकणारा रोहित पहिला कर्णधार ठरणार आहे. याआधी कर्णधार म्हणून कोणीही ५० सामने जिंकलेले नाहीत.
T20 विश्वचषक दोनदा जिंकणारा पहिला भारतीय
कर्णधार म्हणून 50 टी-20 जिंकण्याबरोबरच रोहित दक्षिण आफ्रिकेला हरवून आणखी एक मोठी कामगिरी करू शकतो. 2007 मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला होता. रोहित शर्मा त्या संघाचा एक भाग होता. आता रोहितला T20 विश्वचषक दोनदा जिंकणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनण्याची संधी आहे. 2007 मध्ये, रोहितने अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 16 चेंडूत 30 धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी खेळली होती.