IND vs NZ : दुसऱ्या टेस्टआधी न्यूझीलंडला मोठा झटका, पुणे कसोटीआधी मोठा खेळाडू बाहेर
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. दुसऱ्या टेस्टआधी न्यूझीलंडसाठी चांगली बातमी नाहीय. दुसऱ्या कसोटीतही त्यांचा एक मोठा प्लेयर खेळू शकणार नाहीय. भारतासाठी ही एक चांगली संधी असेल.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात होणार आहे. दुसऱ्या टेस्टआधी न्यूझीलंड टीमला मोठा धक्का बसला आहे. टीमचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन या मॅचमध्ये सुद्धा खेळू शकणार नाहीय. तो ग्रोइन इंजरीमधून अजूनही सावरलेला नाहीय. विलियमसनला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. दुसऱ्या कसोटीआधी विलियमसन फिट होईल अशी टीमला अपेक्षा होती. पण असं झालेलं नाही. तो आपल्या फिटनेससाठी न्यूझीलंडमध्येच राहणार आहे.
विलियमसन सध्या रिहॅब प्रोसेसमध्ये आहे, असं न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड म्हणाले. त्याची दुखापत बऱ्याच प्रमाणात बरी झाली आहे. पण अजूनही तो टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी तयार नाहीय. विलियमसनच्या बाबतीत न्यूझीलंडला कोणतीही घाईगडबड करायची नाहीय. त्याला रिकवरीसाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे. विलियमसन तिसऱ्या कसोटीसाठी फिट होईल, अशी अपेक्षा स्टीड यांनी व्यक्त केली.
दुसरा कसोटी सामना कधी सुरु होणार?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. टीमचा सिनियर खेळाडू केन विलियमसन ग्रोइन इंजरीमधून सावरेल अशी मॅनेजमेंटला अपेक्षा होती. पण असं झालेलं नाहीय. त्यामुळे न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडे टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीत हरवून भारतात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. विलियमसनच्या असण्यामुळे टीमला अनुभवाचा फायदा मिळतो. पण तो नसल्यामुळे अडचणी वाढू शकतात.
भारताचा त्याचा रेकॉर्ड काय?
आशियामध्ये विलियमसनचा रेकॉर्ड खूप शानदार आहे. फिरकी गोलंदाजी तो चांगली खेळतो. आशियात त्याने 24 कसोटी सामन्यात 48.85 च्या सरासरीने धावा केल्यात. तेच यूएईमध्ये 64.70 च्या सरासरीने 647 धावा केल्या आहेत. भारतात त्याचा रेकॉर्ड तितका चांगला नाहीय. भारतात 8 कसोटी सामन्यात 33.53 च्या सरासरीने त्याने धावा केल्यात.
पुण्याची विकेट कशी असेल?
टीम इंडिया बंगळुरुतील पराभवानंतर जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न करणार आहे. टीम इंडियासाठी आता पुण्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवली जाऊ शकते. ईएसपीएनक्रिकइंफोनुसार, पुण्याची विकेट सुकी असेल चेंडूला फार उसळी मिळणार नाही. बंगळुरुप्रमाणे इथे सुद्धा टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजांसह उतरेल.