India-New Zealand FTA : न्यूझीलंडच्या संसदेत भारताविषयी ऐतिहासिक चांगला निर्णय, तिथल्या विरोधी पक्षाने सुद्धा दिलं समर्थन
India-New Zealand FTA : न्यूझीलंड हा देश भारतीयांना क्रिकेटसाठी माहित आहे. पण तिथल्या संसदेत आता भारताविषयी एक चांगला निर्णय झाला आहे. त्यामुळे भारत-न्यूझीलंड संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही देश अजून जवळ येतील.

भारत आणि न्यूझीलंडच्या संबंधात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. दोन्ही देश आर्थिक आणि रणनितीक दृष्टीने अजून परस्परांच्या जवळ येणार आहेत. भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार FTA झाला आहे. हा करार लागू करण्यासंबंधीचा कायदा न्यूझीलंडच्या संसदेत मोठ्या बहुमताने मंजूर झाला. न्यूझीलंडमधून भारताला जे सामान पाठवलं जातं, त्यातल्या 95 टक्के निर्यातीवरील टॅरिफ पूर्णपणे बंद होईल किंवा कमी होईल. संसदेत या विधेयकाच्या बाजूने 93 आणि विरोधात फक्त 29 मतं पडली. न्यूझीलंडमधला मुख्य विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीने सुद्धा या विधेयकाचं खुलेपणाने समर्थन केलं.
देशहित आणि भारतासोबतचे व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने या विधेयकांचं समर्थन केलं. या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे हा करार लागू झाल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक उत्पादनांवरील कस्टम ड्यूटी तात्काळ प्रभावाने शून्य होईल. न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्ले यांनी समाधान व्यक्त केलं आहे. “हा करार यावर्षीच प्रभावीपणे लागू होईल. त्यामुळे निर्यातकांना तात्काळ मोठा फायदा होईल” असं टॉड मॅक्ले म्हणाले.
न्यूझीलंड भारतात किती गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध?
या व्यापार करारानुसार न्यूझीलंडने आपली बाजारपेठ भारतासाठी पूर्णपणे खुली केली आहे. भारतातून न्यूझीलंडला पाठवल्या जाणाऱ्या सर्व सामानाला 100 टक्के ड्यूटी-फ्री प्रवेश मिळेल. न्यूझीलंड सरकारने पुढच्या 15 वर्षात भारतात 20 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
न्यूझीलंडचं नववं सर्वात मोठ एक्सपोर्ट मार्केट भारत
यावर्षी एप्रिल महिन्यात दोन्ही देशांनी करारावर स्वाक्षरी केली होती. जून 2026 पर्यंतच्या आकड्यांनुसार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 3.99 अब्ज न्यूजीलंड डॉलर ($2.29 बिलियन) पर्यंत पोहोचला आहे. न्यूझीलंडचं नववं सर्वात मोठ एक्सपोर्ट मार्केट भारत आहे. दोन्ही देशांमध्ये कायदेशीर आणि अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा करार पूर्णपणे लागू होईल.
न्यूझीलंड सोबत FTA सुद्धा त्याचं साखळीचा भाग
अमेरिकेने मागच्यावर्षी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला होता. आता सुद्धा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून टॅरिफ लावण्याची धमकी दिली जात आहे. अमेरिकेने टॅरिफ वॉर सुरु केल्यानंतर भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसला होता. त्यातून धडा घेत भारताने अन्य देशांसोबत आपला व्यापार वाढवायला सुरुवात केली. युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करार फ्रि ट्रेड अॅग्रीमेंट केलं. न्यूझीलंड सोबत FTA सुद्धा त्याचं साखळीचा भाग आहे.
