राज्यातील अनेक भागांना पावसानं चांगलंच झोडपलं, पाहा कुठं काय आहे परिस्थिती?
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुठे गावांचा संपर्क तुटला आहे. तर कुठे घरात पाणी शिरलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय. कोकणात काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील अनेक भागांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अकोला जिल्हातल्या बार्शी टाकळी येथे संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान या पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलं. यवतमाळच्या चानी कामठवाडा गावात अनेक घरात पुराचं पाणी शिरलं. मुसळधार पावासामुळे नाल्याला पूर आल्याने घरांमध्ये पाणी साचलं. घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं आर्थिक नुकसान झालंय.
अमरावतीच्या नालवाडामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. नालवाडामधील नाले तुडुंब भरून वाहत होते. रस्त्यावरील पुलांवरुन पुराचं पाणी वाहत असल्याने वाहनचालकांची तारेवरची कसरत सुरु होती. शेती पुराच्या पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला. कृष्णा नदीचं पाणी पात्राबाहेर आलंय. नागठाणे बंधाराच्या पाणीपातळीत 15 फुटांनी वाढ झाल्यानं बंधारा पाण्याखाली गेला आहे.
सांगलीच्या पलूसमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने काही गावांचा संपर्क तुटलाय. बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे सांगवी परिसरातील नदी नाले तुडुंब भरलेत.
रत्नागिरीत भारजा नदीत वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचे थरारक रेस्क्यू करण्यात आलं. जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं फांदीचा आधार घेतला होता. बांधावरुन जाताना पाय घसरुन शेतकरी नदीत पडला होता.
नाशिकच्या अंजनेरीवर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरूणांचं रेस्क्यू करण्यात आलं. 8 तासानंतर तरुणांची सुटका वन विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. मानवी साखळी तयार करून ट्रेकर्सचं रेस्क्यू केलं.
रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे वाहनधारकांना महामार्गावरुन जाताना चांगलीच कसरत करावी लागलीय.
रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्ररुप पाहायला मिळालं. मांडवी किनारपट्टीवर 4 मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. रत्नागिरीच्या दापोलीत साखलोलीत डोंगर उतारावरची माती खाली आली. डोंगर खचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
बीडच्या सौताडामधील रामेश्वर धबधबा प्रवाहित झालाय परिसरात धुकं पसरले आहेत. धबधब्याचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
सातपुड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मनुदेवी धबधबा प्रवाहित झालाय. धबधब्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झालंय.
संभाजीनगरचा अजिंठा लेणीचा धबधबा प्रवाहित झाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संभाजीनगरात पावसाला सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरीही सुखावलाय.
राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागात सतत होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर काही भागात वरुणराजाच्या हजेरीनं शेतकरी सुखावलाय.